Wednesday, November 23, 2016

ब्रेकिंग न्यूज- नाशिक मध्ये गंजलेल्या रेल्वे डब्ब्यांची राजरोस चोरी .

(आमच्या वार्ताहराकडून )
नाशिक - नाशिक मध्ये गेल्या साडेचार वर्षांपासून एकाच जागेवर उभ्या असलेल्या रेल्वे इंजिनाच्या डब्ब्यांची राजरोसपणे चोरी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.सदर रेल्वे एकाच ठिकाणी ऊन ,वारा व पैशात ...सॉरी पावसात उभी असल्यामुळे गंजून गेली असून आतापर्यंत तिच्या ४० पैकी २१ डब्ब्यांची चोरी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आमच्या वार्ताहराने अधिक चौकशी केली असता अजून चार डब्बे खिळखिळ्या अवस्थेत असून त्यांना खरेदी करण्यासाठी काही भंगार व्यापाऱ्यांनी सेटिंग लावून ठेवल्याचे कळले.खरेदीदारांशी संपर्क साधला असता त्यांनी हि सौदेबाजी खरी असल्याची कबुली दिली .जुन्या भंगार डब्ब्यांना रंगरंगोटी करून येणाऱ्या जत्रेत बाळगोपाळांच्या करमणुकीसाठी यांचा वापर करणार असल्याचे त्यांनी आमच्या वार्ताहरास सांगितले.
आमच्या वार्ताहराने सदर रेल्वेबद्दल अधिक तपशील गोळा केला असता अतिशय रंजक माहिती समोर आली आहे.एक तरुण तडफदार चालक नवे कोरे इंजिन घेऊन नाशिकला आला तेव्हा सर्व नाशिककरांनी त्यांचे मनापासून स्वागत केले होते.या इंजिनाला तुम्ही डबे जोडा मी तुम्हाला स्वर्गाची सफर घडेल असे नाशिक घडवून दाखवतो या आवाहनाला भुलल्यामुळे नाशिककरांनी तब्बल चाळीस डबे या इंजिनाला जोडून दिले होते.माझे इंजिन सगळ्यात वेगळे असून यातून लवकरच निळा धूर (ब्लू प्रिंट) निघेल असा विश्वास इंजिन चालकाने दिला होता .रेल्वे केव्हा पळेल असे जनतेने विचारले असता नऊ महिने नऊ दिवस कळ काढा असे उत्तर चालकाने दिले होते.मात्र इंजिन साडेचार वर्ष एकाच जागेवर उभे राहून कुंथत राहिल्यामुळे निळ्याऐवजी काळा धूर फेकत राहिले. त्यामुळे मागच्या सर्व डब्ब्यांचे तोंड काळे (दाढीसकट ) काळे झाले असून त्यांची अवस्था भंगारातल्या डब्ब्यांसारखी झाली आहे. सुरुवातीच्या काळात याच डब्ब्यांनी नाशिकच्या प्रेस मध्ये छापलेल्या नोटा मुंबईला वाहून नेण्याचे काम केले होते.परंतु आज त्यांची अवस्था पाचशे व हजारच्या नोटेसारखी झाली आहे.एकीकडे जनता बँकेच्या दारात रांग करून उभी असून दुसरीकडे हे डबे भंगाराच्या व्यापाऱ्यांकडे रांग करून उभी आहेत.उरलेल्या डब्यांची चोरी होऊ नव्हे म्हणून प्रयत्न केले जात असले तरी चालक परागंदा असल्यामुळे यात यश येते की शंका नागरिक उपस्थित करीत आहेत.चालकाच्या या वर्तनामुळे नागरिक चांगलेच ना `राज ` असून इंजिनाला मोडीत काढून नाशिकमध्येच मूठमाती द्यावी अशी मनोमन इच्छा बाळगून आहेत.

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...