Friday, July 13, 2018

.....तर महासत्ता हे दिवास्वप्नच !

.....तर महासत्ता हे दिवास्वप्नच !
कोणाच्या पापामुळे यांच्यावर उंदीर विकण्याची आणि खाण्याची वेळ आली ? या पोस्टवर मोदींचे समर्थक लगेच मागच्या सरकारांवर खापर फोडतील तर नैराश्याने त्रस्त असलेल्या लोकांच्या तोफा मोदींना टार्गेट करतील .मात्र सोशल मीडियावर विनोदाने फिरणारा हा फोटो माझे मन बेचैन करत होता.घरात बसून ऑनलाईन पिझ्झा बर्गरची ऑर्डर देऊन ते मागवून खाण्याचे दिवस आलेत तरी सुद्धा देशाच्या अनेक भागातील आठवडे बाजारातील हे दृश्य नेहमीचेच आहे.`त्यांच्यात` उंदीर खाण्याची परंपरा आहे असे म्हणून आपण पळवाट शोधू शकतो. परंतु सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही .स्वातंत्र्य मिळून मोठा काळ लोटला तरी सरकार यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करू शकत नाही ही खेदाची बाब आहे.आज देशभर अन्नधान्याची गोदामे भरभरून वाहत आहे.इतकी कि धान्य ठेवायला जागा अपुरी पडते आहे .अनेक रेल्वे स्टेशन्सवर बाजार समित्यांच्या आवारात धान्याच्या थप्प्याच्या थप्प्या पावसात भिजत आहे. मग ते धान्य या लोकांना वाटायला सरकारला लाज वाटते कि काय हे समजायला मार्ग नाही.देशाचे नागरिक म्हणून आपणही आपली जबाबदारी टाळू शकत नाही. मोठमोठ्या समारंभातून अन्नपदार्थांची नासाडी आपण थांबवली पाहिजे. सध्या लग्नसमारंभ किंवा हॉटेलांमध्ये अन्न उष्ट टाकायचे फ्याड आले आहे. लग्नांमध्ये ताटात स्वतःच्या हाताने वाढून अर्धे जेवण फेकण्यात लोकांना मोठेपणा वाटतो.वाढदिवसाच्या पार्ट्यांमध्येसुद्धा एकमेकांच्या तोंडाला केक चोपडण्याचे आणि डोक्यावर अंडे फोडण्याची विकृती समाजात आली आहे. `अन्न हे परब्रम्ह ` ही आपली संस्कृती असताना अन्न पायदळी तुडवले जाते.जोपर्यंत पोटाची भूक भागवण्यासाठी उंदीर खाणाऱ्यांमधील आणि संपत्तीचा माज आला म्हणून अंडे फोडणाऱ्या,अन्न पायदळी तुडवणाऱ्यांमधील दरी बुजवली जात नाही तोपर्यंत आपला देश महासत्ता बनेल याचे आपण स्वप्न पाहू नये .

No comments:

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...