Sunday, January 5, 2020

🍑 हापूसच्या पेटीतले रायवळ आंबे 🥭


(लेख मोठा असला तरी शेवट मात्र जरूर वाचा )
लग्नांचा हंगाम सुरु झाला असून वधूवरांच्या पालकांची धावपळ नको व एकाच ठिकाणी त्यांना अनेक स्थळे पाहायला मिळावीत म्हणून मी वधुवर परिचय मेळाव्यांचे आयोजन करीत असतो.त्याला समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो.मात्र गेल्या दोन तीन मेळाव्यांपासून काही लोकांशी माझे खटके उडत आहेत.योगायोगाने म्हणा किंवा काय हे सर्व लोक वेगवेगळ्या महाविद्यालयांमधले  प्राध्यापक आहे. हे प्राध्यापक माझ्यामागे शनीसारखे लागले की काय अशी मला शंका यायला लागली आहे.  त्यांच्यासाठीचा अंगारा धुपारा माझ्याकडे आहे आणि अर्थात हे शनी महाराज मोजकेच आहेत म्हणून मी लेखाचे शीर्षक समर्पक असे लिहले आहे.याविषयावर लेख लिहावा असे मला कधी वाटले नाही.परंतु परवाच्या माझ्या मालेगाव मेळाव्यात एका प्राध्यापकाशी माझा पंगा पडला आणि तेव्हापासून एकदा लिहावेच असे मला वाटू लागले.या प्राध्यापकांनी गेल्या महिन्यात माझ्याकडे मुलीचे नाव नोंदवले आहे.मुलगी उच्चशिक्षित असून नोकरीला आहे.नावनोंदणीपासून त्यांना अनेक स्थळांची माहिती त्यांच्या व्हाट्सअपवर पाठवली आहे .तरीसुद्धा ते इतर समाजबांधवांसमोर माझी हजेरी घेत होते.सटरफटर स्थळे दाखवतात.जरा दहा पंधरा लाख पॅकेज असलेले स्थळे दाखवा असे त्यांचे म्हणणे होते.म्हणून मी त्यांना त्यांच्या व्हाट्स अप वर पाठवलेली दोन स्थळे दाखवली.दोघं मुलांना चांगले पंधरा लाखाच्या आसपास भरभक्कम पॅकेज होते.त्यातल्या एका मुलाचा फोटो दाखवत सरांनी मला विचारले याचे थोबडे पाहण्यासारखे तरी आहे का ? इतका वेळ मी राखून ठेवलेला संयम सोडला आणि तात्काळ त्यांना उत्तर दिले . सर ,एवढी गुर्मी बरी नव्हे. तुम्ही प्राध्यापक आहात.दुसऱ्याच्या मुलाबद्दल बोलताना जरा विचार करायला हवा.उद्या तुमच्या मुलीबद्दल कुणी असे बोलले तर तुम्हाला काय वाटेल ? माझा पारा चढलेला पाहून प्राध्यापक महाशयांनी पाय काढता घेतला .पण दिवसभर माझ्या डोक्यात त्यांची गुर्मी घर करून राहिली.हा झाला मालेगाव मेळाव्याचा किस्सा .
 आता नाशिक मेळाव्यातल्या रायवळ आंब्याची गोष्ट. खरं तर यांनी यांच्या मुलामुलींच्या स्थळाची  जबाबदारी आपल्याकडे दिलेली असते.लोकांशी कसे वागत असतील माहित नाही पण निदान आपल्याशी तरी यांनी सौजन्याने वागले पाहिजे.तेव्हा आपण यांच्या स्थळाची दुसऱ्यांकडे वकिली करू शकतो.नाशिकच्या मेळाव्यात एक प्राध्यापक महाशय नेहमी फुकट घुसून येतात . मेळावा आयोजित केलेल्या हॉलचे भाडे ,आयोजनासाठी येणारा खर्च, जाहिरातीचा खर्च वसूल व्हावा  आणि अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून माफक प्रवेश फी ठेवलेली असते.सदर प्राध्यापकांना मी या आधीच्या दोन तीन मेळाव्यांना आले असता फी भरण्याचा आग्रह करायचो.तेव्हा ते घरी निघून जायचे.आताच्या मेळाव्यात मात्र मी तसा आग्रह केला नाही.त्यांना बसू दिले .नंतर मुख्य कार्यक्रम सुरु व्हायच्या आधी माइकवरून सर्वांना विनंती केली की ज्यांनी फी भरून फॉर्म घेतले नसतील त्यांनी त्वरित घ्यावे. थोड्या थोड्या अंतराने तीन वेळा पुकारून सुद्धा महाशय शांत बसले होते.चांगला दीड एक लाख रुपये पगार.बायकोही नोकरीला आणि जिचे लग्न करायचे आहे तीसुद्धा नोकरीला .तरीसुद्धा तीनशे रुपये फी भरायला टाळाटाळ.शेवटी मी त्यांचे नाव पुकारून विचारणा केली.त्याचा त्यांना प्रचंड राग आला आणि कार्यक्रमात गोंधळ घालायला सुरुवात केली.तुझ्याकडे बघून घेतो अशी गुंडगिरीची भाषा सुरु केली.दोन महिला पालकांनी त्यांना दम भरला तेव्हा कुठे ते सभागृहाच्या बाहेर गेले.
 तिसरा किस्सा सटाणा मेळाव्याच्या आद्ल्या दिवशीचा सुरगाणा महाविद्यालयातल्या रायवळ आंब्याचा.हा नेमका आमच्याच गावाजवळचा.पण ओळख नव्हती. रात्री जवळपास साडेदहा पावणे अकरा वाजता फोन आला.मी डॉक्टर बोलतोय म्हणून सुरुवात झाली .उद्याच्या मेळाव्याला किती फी ठेवली अशी डॉक्टरांनी चौकशी केली.मीही सांगितले ,तीनशे रुपये फी आहे म्हणून.तिकडून महाशय माझ्यावर तडकले ,तुम्ही लोकांकडून पैशे कशाला घेतात ? मी माझी भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.डॉक्टर ऐकेच ना. तुम्ही हॉलचे भाडे भरा,मी लोकांकडून एक रुपयाही घेणार नाही असा  प्रस्ताव त्यांना दिला .त्यालाही स्वारी बधेना .मी त्यांची चौकशी केली ,डॉक्टर तुम्ही कुठे प्रॅक्टिस करतात ? त्यावरही त्यांचे उत्तर , मी काय करतो हे विचारने गरजेचे आहे का ? त्यांच्या बोबड्या बोलांवरून ते बैठकीला बसलेले होते हे मला कळून चुकले होते.मी थोड्या प्रेमाने चौकशी केली तेव्हा त्यांनी त्यांचे गाव सांगितले व मी वैद्यकीय डॉक्टर नसून प्राध्यापक डॉक्टर आहे आणि मला सगळे तात्या म्हणतात अशी माहिती दिली.महाशयांच्या गावात आणि माझ्या गावात फक्त नदी आडवी.ओळखपाळख निघाली तरी त्यांचा एकच घोषा, तुम्ही पैशे का घेतात ? यांची वाकडी शेपटी अशी काही सरळ होणार नाही हे मी ओळखले आणि त्यांचा यथेच्छ समाचार घेत माझ्यातले सुप्तगुण मनसोक्त उधळले .
 असे अनेक रायवळ आंबे आहेत.पण आता एक शेवटचा किस्सा थोडक्यात सांगतो. माझ्या एका नातेवाईकाने त्याच्या प्राध्यापक मित्राला मुलीच्या नावनोंदणीसाठी माझ्याकडे पाठवले होते.नावनोंदणीचे सगळे सोपस्कार पार पडले .फी जमा केली आणि शेवटी त्यांना मुलाबद्दलच्या अपेक्षा विचारल्या.मुलगा मुंबई,पुण्याला नोकरी करणारा असला पाहिजे.नाशिकला नोकरीला असला तरी चालेल पण त्याला एक अट राहील. अट विचारली तर त्यांनी निर्लज्जपणे सांगितले ,मुलाने लग्नानंतर आईवडिलांपासून वेगळे राहिले पाहिजे . 🙏 भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी*🙏 या उक्तीप्रमाणे तात्काळ त्यांचा बायोडाटा त्यांच्या तोंडावर मारून फेकला आणि घेतलेली फी परत केली.झाला प्रकार त्यांना अनपेक्षित होता.त्यांना *घरातून हाकलून देताना सांगितले,तुम्ही लोक समाजाला कलंक आहात.निघा इथून ,पुन्हा तोंड दाखवू नका. ज्या नातेवाईकाने त्यांना माझ्याकडे  पाठवले त्याच्याकडे त्यांनी माझी तक्रार केली मात्र कशामुळे हाकलून दिले हे सांगितले नाही .त्या नातेवाईकाला माझ्या स्वभावाची कल्पना होती म्हणून त्याने त्यांनाच जाब विचारला ,तुमचेच काहीतरी चुकले असेल म्हणून हेमंत तुमच्याशी असा वागला.
  मित्रांनो ,हे सगळे किस्से सांगण्यामागे कोणाची बदनामी करण्याचा हेतू नाही. नाशिक जिल्ह्यातले   अनेक प्राध्यापक ,काही महाविद्यालयांचे प्राचार्य माझे नातेवाईक,मित्र आहेत.त्यांच्या बुद्धिमत्तेचा ,ज्ञानाचा सुगंध हापूसच्या सुगंधासारखा दरवळत असतो.वेळोवेळी त्यांचे सहकार्य,मार्गदर्शन मला मिळत असते. त्यांच्या पेटीत सापडलेले हे रायवळ आंबे समाजासमोर ठेवणे गरजेचे आहे.कारण सोयरीक संबंध जुळवताना बोटचेपे धोरण ठेवले तर अशा रायवळ आंब्यांमुळे कोणाचे तरी आयुष्य उध्वस्त होण्याची शक्यता असते .असे होऊ नये म्हणून मी जास्तीत जास्त स्पष्ट बोलत असतो.भले चार लोक माझ्याकडे कमी आले तरी चालतील. पण जे येतील ते उच्च विचारांचे, शुद्ध चारित्र्याचे आणि खानदानी असले पाहिजेत असा माझा आग्रह असतो.
 (कृपया यांची नावे कोणी विचारू नये. विचारले तरी सांगितले जाणार नाही.कारण त्यांच्या पाल्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तेव्हढी नैतिकता मी पाळतो) 

No comments:

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...